शहरातील ५१ केंद्रांवर परीक्षा २५ हजार ७७९ विद्यार्थ्यांचा दहावीचा पहिला पेपर
पिंपरी-चिंचवड दि. 21 (प्रतिनिधी) – दहावीच्या राज्य मंडळाची लेखी बोर्ड परीक्षा शुक्रवार दि. २० पासून सुरु झाली आहे. दहावीच्या परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना सुरक्षित, शांत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आलेली आहे.या परीक्षेला पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील एकूण ५१ परीक्षा केंद्रांवर तब्बल २५ हजार ७७९ विद्यार्थी बसलेली आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार अनेक उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच बैठे भरारी पथकांचेही नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पथकांमार्फत परीक्षा केंद्रांवर अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे, जेणेकरून परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि शिस्त अबाधित राहील.
परीक्षा काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह परीक्षेची शिस्त राखण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे, तसेच कोणतेही प्रतिबंधित साहित्य सोबत आणू नये, असे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


